वैज्ञानिक दृष्टिकोनाचे महत्त्व
‘विज्ञान’ हा आजकाल परवलीचा शब्द आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन हा तयार व्हावा लागतो. मुलांमधे तो रुजविण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात. वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण झाल्याने अनेक फायदे होतात. तसेच विविध मूल्ये रुजविली जातात. विज्ञान | शिकण्याची आवश्यकता तसेच वैज्ञानिक दृष्टिकोन तयार झाल्याने होणारे फायदे व मूल्ये कोणती याची सविस्तर मीमांसा येथे दिली आहे.
एकविसावे शतक हे जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरणाचे आहे. या बरोबर माहिती तंत्रज्ञानाचे आहे, हे निर्विवाद सत्य आहे. आज माहितीचा प्रचंड विस्फोट झालेला आहे. मागील शतकात जेवढा बदल झाला नाही तेवढा बदल या दशकात झाला आहे. या बदलांना जुळवून घेणारा विद्यार्थी तयार करणे, हे शिक्षकांपुढील आव्हान आहे. काल घेतलेले ज्ञान आज कालबाह्य होत आहे. या तंत्रज्ञानाच्या वेगाशी जुळवून घेणारा विद्यार्थी शिक्षकांना तयार करावयाचा आहे. हा विद्यार्थी नीरक्षीर विवेकबुद्धीने वागणारा घडला पाहिजे. त्यासाठी शिक्षकांना स्वत:बरोबर विदयार्थ्यांमध्ये अनेक मूल्यांची पेरणी करावी लागणार आहे. त्यातील सर्वांत महत्त्वाचे मूल्य म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन हे होय. हा दृष्टिकोन निर्माण होतो विज्ञान विषयातून विज्ञान हा सर्व शास्त्रांचा पाया आहे. जगाच्या विकासाचा, शाश्वत सुखाचा व कल्याणाचा मार्ग म्हणजे विज्ञानाची कास धरून प्रगती साधणे हा होय. विज्ञानाचे महत्त्व अधोरेखित करताना प्रसिद्ध भारतीय शास्त्रज्ञ डॉ. वसंत गोवारीकर म्हणतात, आज काळ आणि वेग या संकल्पना संकचित होत आहेत.
त्यासाठी शाळा स्तरावरील विज्ञान विषयाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
विज्ञान विषयामुळे विदयार्थ्यांमध्ये खालील उद्दिष्टे विकसित होतात.
१) चौकस बुद्धी विकसित करणे.
२) सर्जनशीलता अंगी बाणवणे.
३) प्रश्न विचारण्याचे धाडस निर्माण करणे.
४) निर्णय घेण्याची क्षमता विकसित करणे.
५) विज्ञानाबद्दल अभिरुची निर्माण करणे.
६) लोकशाहीतील उत्तम नागरिक तयार करणे.
७) समाजातील अंधश्रद्धा, भोळसर समजुती, चुकीच्या रूढी-परंपरा नाहीसे करण्याची वृत्ती निर्माण करणे.
८) विद्यार्थ्यांमधील भावी शास्त्रज्ञ शोधून त्यांची मनोभूमिका तयार करणे.
९) जीवनातील समस्या शास्त्रीय पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करणे.
१०) विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे.
या सर्व उद्दिष्टांची पूर्ती करण्यासाठी शिक्षकांनी दैनंदिन जीवनात स्वत:च्या आचरणातून व विज्ञान अध्यापनातून स्वतः वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार केला पाहिजे. विदयार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारण्यास भाग पाडले पाहिजे.
विदयार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी प्राथमिक इयत्तेपासून प्रयत्न व्हायला पाहिजेत. त्यासाठी शिक्षकांनी प्रसंगानुरूप वेगवेगळे उपक्रम राबविणे आवश्यक आहे. त्या वयोगटाला आवडतील, झेपतील तसेच पाठ्यपुस्तकांना सुसंगत अशा प्रयोगांची मांडणी करून विदयार्थ्यांना केलेल्या कृतीची महिती दयावी. कृतीचे निरीक्षण करून अनुमान काढल्यास त्या प्रयोगाची सत्यता विदयार्थ्यांना पटेल, ते त्यांच्या कायमस्वरूपी लक्षात राहील. त्यावर इतरांनी शंका घेतल्यास त्या शंकेचे निरसन करण्याची क्षमता त्या विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होईल. म्हणजेच त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाची जोपासना होईल. त्यासाठी शिक्षकाला अनेक उपक्रमांचे आयोजन करता येईल. उदाहरणार्थ परिसरातील उपलब्ध साहित्यापासून वैज्ञानिक खेळणी तयार करणे. त्यामागील वैज्ञानिक तत्त्व समजावून सांगणे. त्यामुळे विदयार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागेल. परिसरातील वनस्पतींचे औषधी गुणधर्म समजावून देऊन विदयार्थ्यांना त्याचे महत्त्व समजून सांगणे. तसेच प्रसंगानुरूप त्यांचा उपयोग करण्यास सांगणे. विज्ञान सप्ताह, विज्ञान मेळावे, विज्ञान प्रदर्शने आयोजित करून त्यामध्ये विदयार्थ्यांना प्रयोगाची मांडणी करण्यास प्रोत्साहन देणे, जेणेकरून विदयार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण होऊन वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होईल. दरवर्षी जुलै महिन्यात वृक्षारोपण पंधरवडा साजरा करून, वर्षभर वृक्षसंवर्धन उपक्रम चालू ठेवावा. प्रत्येक विदयार्थ्यांला एक झाड दत्तक दयावे. वेळोवेळी झाडाच्या वाढीचा आढावा शिक्षकांनी घ्यावा. जागतिक तापमान वाढ, महापूर, अतिवृष्टी, अनावृष्टी, अवेळी पडणारा पाऊस, गारपीट या महाभयानक समस्येचे मूळ कारण वृक्षतोड, हे समजावून सांगावे. म्हणून पर्यावरण संतुलनासाठी वृक्षारोपण व संवर्धनाचे महत्त्व वादातीत आहे, ही जाणीव व जागृती विदयार्थ्यांमध्ये करणे म्हणजेच वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे होय. पर्यावरण व व्यसनमुक्ती दिनानिमित्त जागृती पथफेऱ्यांचे आयोजन करणे. व्यसनांचे दुष्परिणाम भित्तिचित्रांच्या माध्यमातून समजावून सांगितल्यामुळे ते विदयार्थ्यांच्या कायम स्वरूपी लक्षात राहतात. आपसूकच विदयार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागतो. स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी स्वच्छ शरीर आनंददायक आरोग्य व निरोगी मन या संकल्पना समजावून देणे आवश्यक आहे. शास्त्रज्ञांच्या जयंत्या – पुण्यतिथ्या असे दिन साजरे करणे. त्यामुळे त्यांनी लावलेले शोध, मानवजातीसाठी त्याची उपयुक्तता, त्या शोधामुळे मानवी जीवनात झालेले परिवर्तन याची माहिती विदयार्थ्यांना करून दिल्यामुळे त्यांच्यामध्ये कुतूहल, जिज्ञासा व प्रेरणा निर्माण होईल त्यावेळी म्हणता येईल,
‘जिज्ञासा होई पूर्ती । कर्तव्याची जाण चित्ती । |
स्मृती या छात्रा देती स्फूर्ती । चैतन्याची मिळते शक्ती।।
त्यामुळे विदयार्थ्यांमध्ये वैज्ञानिक जाणिवा प्रगल्भहोण्यास मदत होते. बुवाबाजी, अंगात येणे यासारख्या सामाजिक समस्यांमागील विज्ञान विद्यार्थ्यांना शिक्षकांनी समजावून सांगावे, त्यामुळे निकोप मानसिकता वाढीस लागेल. प्रत्येक गोष्ट विज्ञानाच्या कसोटीवर तपासण्याची सवय लागेल. विदयार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होईल. त्यामुळे चौकसपणा आणि तर्कशुद्ध विचारांना चालना मिळेल. अंधश्रद्धेवर आधारित भाकड विचारांवर मात करता येईल. त्यासाठी शिक्षकांनी उपक्रमांची आखणी प्रसंगानुरूप व जाणीवपूर्वक केली पाहिजे.
संविधानाच्या कलम ५१ अ नुसार या कर्तव्याचा आणि त्या योगे येणाऱ्या कर्तव्यभावनेचा प्रसार करणे हे आपल्या प्रजासत्ताकाचे एक जगावेगळे वैशिष्ट्य आहे. त्यासाठी एक शिक्षक म्हणून मी माझ्या स्वतः मध्ये, माझ्या विदयार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यास बांधील राहणे, हे माझे आद्य कर्तव्य आहे.
/*54745756836*/